आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले

adminuser • Political • March 13, 2026

पुणे : टेलिग्राम चॅनेलवरील ‘रिप्लेस’ या फिचरचा गैरफायदा घेऊन एका १८ वर्षांच्या युवकाने राज्य माध्यमिक शिक्षण मंडळासह अनेकांना गंडवले. पोलिसांच्या तपासात या युवकाने टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या टेलिग्राम चॅनेलवर पेपर फुटल्याचे दिसत असले, तरी तो प्रत्यक्ष परीक्षा झाल्यानंतर बदलण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दहावीचा कोणताही पेपर फुटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

चैतन्य विनोद शेंडे (वय १८) असे फसवणूक करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका भाग १ व भाग २ फुटल्याची फिर्याद महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत जवळीकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती. परीक्षा होण्यापूर्वीच गणित १ व गणित २ चे पेपर टेलिग्राम चॅनेलवरील ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६’ या ग्रुपवर टाकल्याचे दिसून आले होते.

हा ग्रुप तयार करणाऱ्या चैतन्य शेंडे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने फाइल मॅनिप्युलेशन तंत्राचा वापर करून ही फसवणूक केल्याचे समोर आले. टेलिग्रामवर एकदा पीडीएफ फाइल अपलोड केली की ती नंतर बदलता येते.

फाइल बदलल्यावर फक्त मजकूर बदलतो, तर मूळ टाइमस्टॅम्प तसाच राहतो. फक्त ‘एडिटेड’ असा शेरा सोबत दिसतो. आरोपी परीक्षेच्या एक दिवस आधी पासवर्ड संरक्षित पीडीएफ फाइल अपलोड करत असे. त्यानंतर तो त्या ग्रुपवर मेसेज पोस्ट करून ६०० रुपये दिल्यास परीक्षेचा पेपर देऊ शकतो, असा दावा करत असे. विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यानंतर तो त्यांना तातडीने ब्लॉक करत असे.

प्रत्यक्ष परीक्षा संपल्यानंतर तो खरी प्रश्नपत्रिका मिळवत असे आणि पूर्वी अपलोड केलेली पासवर्ड संरक्षित फाइल प्रत्यक्ष पेपरने बदलत असे. त्यामुळे नंतर पाहणाऱ्यांना त्याने परीक्षेपूर्वीच प्रत्यक्ष पेपर अपलोड केला आहे, असे वाटत होते.

त्यामुळे पेपर फुटल्याचा भास निर्माण होत होता. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली, याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले.

get_footer();