आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्वानंद संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिलांचा सन्मान

पिंपरी चिंचवड : भगवान महावीर जन्मकल्याणक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने समाजासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महिलांचा स्वानंद महिला संस्था, पिंपरी चिंचवड व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘माता त्रिशला माई रमा पुरस्कार’ देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम बिजलीनगर येथील ब्रह्मचैतन्य हॉलमध्ये पार पडला. यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, जैन कॉन्फरन्स जैन भवनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संस्थेच्या संस्थापिका व राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया आणि स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्काराचे मानकरी म्हणून ताराबाई मदनलाल बाकलीवाल, लता अशोकजी पगारिया आणि केशरबाई हरकचंदजी भन्साळी यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ‘स्वानंदी जगण्याची कला’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड आणि शुभांगी कात्रेला यांनी सकारात्मकतेने जीवन कसे जगावे यावर प्रभावी मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या जीवनातील अनुभव मांडत उपस्थितांना आत्मपरीक्षणासाठी प्रेरित केले.

या चर्चासत्रात उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका आशा सूर्यवंशी, प्रा. सुरेखा कटारिया आणि शोभा बंब यांनीही सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा बंब यांनी केले. नवकार महामंत्राच्या पठणाने कार्यक्रमाची सुरुवात कंचनमाला बाफना आणि सुनिता कांकरिया यांच्या स्वरांनी झाली.

यावेळी कासारवाडी संघाचे अध्यक्ष विलास पगारिया, दापोडी संघाचे अध्यक्ष दिलीप भन्साळी, पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, पारस भवनचे अध्यक्ष देवेंद्र बाकलीवाल, जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत भन्साळी, जैन कॉन्फरन्स पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया, तपस्वी प्रवीणजी भन्साळी, स्वानंदच्या माजी अध्यक्षा सुनिता देसर्डा, राजश्री बिनायकिया, मंजू धोका आदी मान्यवर उपस्थित होते.

सुनिता लुणावत यांनी संस्थेच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे संयोजन सविता बाँटिया, मनीषा चोरडिया, अलका कुंकूलोळ, रोहिणी भटेवरा, अंजली वर्टी, पायल ललवाणी आणि शलाका कटारिया यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. वैशाली लोढा यांनी मानले, तर सूत्रसंचालन शुभांगी कात्रेला यांनी केले.

get_footer();